<p><strong>मुंबई :</strong> कोरोना लस वाटपात इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रावर पुन्हा अन्याय झाल्याचं चित्र आहे. केंद्राच्या कोविड लस वाटपात महाराष्ट्राच्या वाट्याला पुन्हा कमी डोस आले आहेत. आज केंद्राने केलेल्या लसीचा वाटपात महाराष्ट्राला अवघे सात लाख 40 हजार डोस देण्यात आले आहेत. तर भाजपचं सरकार असलेल्या राज्यांना जास्त डोस दिल्याचं उघड झालं आहे.</p>
<p>महाराष्ट्रात केवळ तीन दिवस पुरेल एवढाच कोरोना लसीचा साठा शिल्लक असल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी काल (7 एप्रिल) झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. तसंच केंद्राने लवकरात लवकर लसीचा पुरवठा करावा, अन्यथा लसीकरण अभियान थांबेल, असंही म्हटलं.</p>
<p>दररोज सहा लाख लसीकरण हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्राला दर आठवड्याला 40 लाख डोसची आवश्यकता आहे, असं राजेश टोपे यांनी म्हटलं होतं. तरीही कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव असूनही केंद्राने आज महाराष्ट्राला फक्त सात लाख 40 हजार डोसचं वाटप केलं आहे.</p>